Back

बातम्या

सामाजिक अस्मितेसाठी माळी समाज स्वव्यवस्थेने रस्त्यावर उतरू शकतो हे माळी महासंघ ने सिद्ध करून दाखवले ::१ जानेवारी फुले दाम्पत्य सन्मान दिन रॅली आता बनली माळी समाजाच्या अस्मितेची रॅली



Date: 06-Jan-2023


 

उत्कृष्ठ व्यवस्था व सुत्रबद्ध नियोजनाबद्दल पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील माळी महासंघ च्या पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम अभिनंदन :: रॅलीत सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे विशेष अभिनंदन 

गेल्या एक महिन्यापासून माळी समाजामधे, माळी समाजमाध्यमांमध्ये एकच चर्चा होती फुले दाम्पत्य सन्मान दिन रॅली. विधानसभेच्या आवारात देखील याचे पडसाद उमटले. पण हे सगळ अचानक एकाएकी घडलं नाही. २०१४ पासून चे नियोजन, मांडणी, जिद्द, मेहनत, चिकाटी,समाजबांधणी, संघटण बांधणी, प्रवास आणि माळी महासंघ च्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी घेतलेली अपार मेहनत हे सगळं याला कारणीभूत होत आणि या सर्वांचा परीपाक म्हणजे १ जानेवारी ला भिडेवाडा पुणे येथील ना भूतो अशी अभूतपूर्व रॅली. न भविष्यती अस मी म्हणणार नाही कारण माळी महासंघ ने निश्चित केलेले किमान १ लाख संख्येचे उद्दिष्ट अजून गाठायचे आहे.
जी गर्दी या रॅलीत जमली होती ती काही गाड्या पाठवून जमवलेली गर्दी नव्हती तर गेल्या ८ वर्षांपासून माळी महासंघ तर्फे "फुले दाम्पत्याच्या सन्मानात माळी समाज मैदानात" हा नारा देत नियोजनबद्ध संघटन बांधणी, संघटणे मार्फत समाज जागृती,विषयाची सातत्यपूर्ण मांडणी,अखंड प्रवास,व समाजबांधवांमध्ये माळी महासंघ च्या भूमिके बद्दल चा निर्माण करण्यात आलेल्या विश्वासावर स्वयंप्रेरणेनं स्वव्यवस्थेने आलेले बांधव होते.
माळी समाजात पहिल्यांदा असे घडले कि महात्मा फुलेंना नेता मानून हि गर्दी जमली होती ज्यात माळी समाजातील अनेक छोटया छोट्या संघटनांचा सहभाग होता आणि आमच्या दृष्टीने हे माळी समाजा करीता आशादायी चित्र आहे.
या रॅली चे वैशिष्ट्य असे कि जास्तीत जास्त कार्यकर्ते सहकुटुंब सहभागी झाले होते त्यामुळे महिलांची संख्या लक्षणीय होती. आम्ही सातत्याने हि भूमिका मांडत आलो आहे कि या समाजाला जर पुढे यायचं असेल तर महात्मा फुलेंनी दिलेल्या विचारानुसार महिलांना सामान दर्जा देण्याची व प्रोत्साहित करून घराबाहेर चे जग बघण्याची मुभा दिली पाहिजे. इतिहास सांगतो कि ज्या कुटुंबातली महिला समाजात वावरते ते कुटुंब सक्षम बनत. 
हि रॅली कुण्या राजकीय पुढाऱ्याच्या पैशातून आयोजित केलेला मेळावा नव्हता तर माळी महासंघ द्वारा करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत समाजाने देणगी स्वरूपात भरभरून मदत केली जे काही थॊडाफर कमी पडले ते माळी महासंघ च्या  पदाधिकाऱ्यांनी वर्गणी करून भरून दिले. 
मी नेहमी सांगतो समाजबांधवांमध्ये समाजाप्रती स्वाभिमान निर्माण करायचा असेल तर कॅडर बेस्ड संघटनेच्या माध्यमातुन समाजातल्या विविध समस्या सोडवण्याकरिता  नियोजनबद्ध कार्यक्रम आखून वाटचाल करणे आवश्यक आहे. माळी महासंघ हि कॅडर बेस्ड संघटना आहे. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत करून महाराष्ट्रात ३५०० ग्राउंड लेव्हल पदाधिकाऱ्यांची फळी निर्माण केली. हि फळी विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम सातत्याने करीत असते. जिल्हा स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिरं झाले असून येणाऱ्या काळात तालुका स्तरापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर विभाग निहाय होणार आहे.  
माळी महासंघ हे माळी समाजा करीता निर्माण केलेले असे दालन आहे ज्या दालनात समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याची व्यवस्था आहे. माळी महासंघ च्या महिला, युवा, किसान, सहकार, शिक्षक व प्राध्यापक, विधी व न्याय, वैद्यकीय, इंजिनीअर, सांस्कृतिक, पत्रकार, जेष्ठ नागरिक ,हिंदी भाषिक तसेच कर्मचारी अश्या १३ आघाड्या असून या आघाड्यांमार्फत प्रत्येक क्षेत्रातल्या घटकांना संघटित करून काम केले जाते.माळी महासंघ ला सर्व पदे भराण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात किमान २५०० ते जास्तित जास्त ३५०० कार्यकर्ते लागतात.  राजकीय व्यक्तीला त्याच्या त्याच्या पक्षात काम करण्याची मुभा आहे परंतु माळी महासंघ च्या प्लॅटफॉर्म वर सर्व आप आपले राजकीय जोडे बाहेर ठेऊनच काम करीत असतात म्हणूनच माळी महासंघ मध्ये सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बिनदिक्कत काम करीत आहेत.  
आज कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात माळी महासंघ चे पदाधिकारी असल्याने १ जानेवारी च्या रॅलीत संपूर्ण महाराष्ट्रातून हज्जारो लोक हजर होते. रॅलीतली गर्दी पाहून इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील ३ ते ४ मिनिटांची स्टोरी चालवली, ८० टक्के वृत्तपत्रांनी मेन पेज ला बातमी लावली. 
हि तर सुरवात आहे माळी महासंघ ने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अजून १० टक्के सुद्धा पदाधिकारी नियुक्त  होऊ शकले नाही. आज ३५०० पदाधिकऱ्यांच्या कमी अधिक प्रमाणात सक्रिय सहभागातून या वर्षीची रॅली पाच आकडी संख्येत पोहचली जेव्हा माळी महासंघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होईल हि संख्या सहा आकड्यात पोहोचायला वेळ लागणार नाही. 
जाता जाता :: जेव्हा समाजात एकत्रीकरणाची  प्रक्रिया सुरु होते तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखायला लागत. मी व्यक्तिशः हे २०१४ पासून सातत्याने अनुभवतो आहे. समाजात एकत्रीकारणाची चळवळ सुरु झाली कि वर्षभर बिळात लपून बसलेली काही पिलावळ शेवटच्या क्षणी बिळातून बाहेर निघून मिठाचा खडा टाकतात. यांच्या मागे दुसऱ्या समाजाची काही मंडळी एकत्रीकरणाच्या चळवळीत फूट पाडण्याकरिता स्पॉन्सरशिप घेऊन उभी तर राहत नाही याचा शोध समाजाने घेण्याची आवश्यकता आहे. 
ज्या ज्या वेळेला माळी महासंघ समाज एकत्री करणाची  चळवळ व्यापक करण्याचा प्रयत्न करतो  त्या त्या वेळी ही मंडळी माळी महासंघ आणि भाजप असा संबंध जोडून समाजाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. माझा या मंडळींना सवाल आहे ज्या वेळी माजी आमदार कृष्णराव इंगळे हे महाराष्ट्र माळी समाज महासंघ चे अध्यक्ष होते मी त्यांच्या सोबत काम करत होतो तेव्हा आम्ही असा नाही म्हंटल कि हि संघटना काँग्रेस ची आहे. ज्या वेळी नाशिक येथे रॅली होती तेव्हा माळी महासंघ ने भरभरून लोक पाठवतांना हा विचार नाही केला कि हि रॅली राष्ट्रवादी च्या नेत्याची आहे. आमच्या मनात कोणतीही खोट  नसल्याने आम्ही शुद्ध हेतूने  काम करतो. तुमच्या मनात खोट असल्याने तुम्ही प्रत्येक वेळी पाट्या टाकता. या वेळेच्या गर्दीने तुम्हाला उत्तर मिळाले असेल अशी अपेक्षा. 
सन्माननीय बाबा अढाऊ यांनी २००५ पासून या विषयाचा पाठपुरावा केला त्यांना नक्कीच श्रेय गेले पाहिजे परंतु आता  जी मंडळी भिडेवाड्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे त्यांना माझा सवाल आहे बाबांनो तुमचा जन्म पुण्यातला तुम्ही गेल्या २५ वर्षांपासून पुण्यातले रहिवासी तरी तुम्हाला भिडेवाडा आणि त्याची अवस्था २०१४ पूर्वी दिसली नाही कारे.... आणि आता आम्ही गेल्या ८ वर्षांपासून पाठपुरावा करून भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक निर्माणातले सर्व अडथळे दूर करून अंतिम टप्प्यात आलो आणि तुम्ही श्रेय घ्यायला पुढे आलात जर आम्ही  २०१८ साली भिडे वाड्याला पुरातन वास्तु म्हणून घोषित करून घेऊ  शकलो नसतो, दरवर्षी गावागावात जाऊन जनरेटा तयार करू शकलो नसतो  तर अजून पुढले कित्येक वर्ष सरकारला निर्णय घेता आला नसता . आभार मानयाचेच आहेत तर आमदार नागो गाणार यांचे माना ज्यांनी दर अधिवेशनात भिडेवाड्याचा विषय आमच्या वतीने मांडला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माना  ज्यांनी या संबंधात वारंवार बैठका लावून सर्व तांत्रिक अडचणी मार्गी लावल्या व पुरातन वास्तु घोषित करून घेण्यास सहकार्य केले...  भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक बनणारच आहे,ज्याला श्रेय घ्यायचे आहे त्याने खुशाल घ्यावे... परंतु  जोपर्यंत एक लाख माळी फुले दाम्पत्याच्या सन्मानात पुणे येथील रॅलीत सहभागी  होणार नाही तो पर्यंत आणि त्यानंतरही आमची चळवळ अविरत चालुच  राहील. 

अविनाश  ठाकरे 
राष्ट्रीय अध्यक्ष 
माळी महासंघ